
विश्वविख्यात कवी रवींद्रनाथांनी म्हटले आहे की, तुम्हाला भारताचे यथार्थ स्वरूप जाणून घ्यावयाचे असेल तर विवेकानंदांच्या ग्रंथांचे अनुशीलन करा. प्रस्तुत पुस्तक वाचल्यानंतर, कविवर्यांचे वरील विधान किती समर्पक आणि वस्तुस्थितिनिदर्शक आहे, हे वाचकांना सहजच कळून येईल. पूर्वेचे अपूर्वत्व कशात आहे, भारताचे भारतत्व वस्तुत: कशात आहे हे जाणून घ्यावयास प्रस्तुत पुस्तक अतोनात साहाय्यभूत होईल यात खरोखर काहीच शंका नाही. अमेरिकेत दिलेल्या या व्याख्यानांत स्वामी विवेकानंदांनी पूर्वेकडील आणि विशेषत: भारतातील काही अवतार-महापुरुषांच्या पावन, उदात्त चरित्रांचे आणि महान, उदार भावांचे अत्यंत स्फूर्तिदायक शब्दांत वर्णन केलेले आहे. भारतीय संस्कृति-संपदेचे माहात्म्य आणि त्यावरील स्वामीजींची गभीर निष्ठा शब्दाशब्दांतून ओसंडत असल्याचा प्रत्यय येतो. प्राचीच्या प्रांगणात सतत तेवणारे हे धर्मदीप आपल्या सर्वांचा जीवनपथ उजळून आपली आदर्शयात्रा सुगम करतील यांत संदेह नाही.